स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बदनामी खटला येत्या ९ मेपर्यंत तहकूब 

न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल गांधींना कागदपत्रे मिळाली : सत्यता पडताळणीसाठी वेळ मागितला

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बदनामी खटला येत्या ९ मेपर्यंत तहकूब 
पुणे:- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ एप्रिल २०२५ :-  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या विरोधात पुण्यातील न्यायालयात दाखल करण्यात आलेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बदनामी खटला येत्या ९ मेपर्यंत तहकूब करण्यात आला आहे. 

खासदार राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी या प्रकरणातील आवश्यक कागदपत्रे मागितली होती. यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे वकील अ‍ॅड. संग्राम कोलाटकर यांनी ही कागदपत्रे राहूल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांच्याकडे शुक्रवारी (दि.२५ एप्रिल) सुपूर्द केली. गांधी यांचे वकील अॅड पवार यांनी या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी न्यायालयाकडे वेळ मागितल्याने हा खटला येत्या ९ मेपर्यंत तहकूब ठेवण्याचा आदेश  एम.पी., एम.एल.ए. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दिला. 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणीखटला चालू आहे. फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी खटला दाखल करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले 'माझी जन्मठेप' हे पुस्तक व एक पेन ड्राईव्ह आणि काही वर्तमानपत्रांची कात्रणे न्यायालयात दाखल केलेली आहेत. त्या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला मिळालेल्या नाहीत. ते सर्व कागदपत्र व माझी जन्मठेप हे पुस्तक बचाव पक्षाला देण्याचे आदेश न्यायालयाने करावेत,असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलींद पवार यांनी मागील सुनावणीवेळी दिला होता. फिर्यादी यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पेन ड्राईव्ह व 'माझी जन्मठेप' हे पुस्तक बचाव पक्षाला म्हणजेच राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड मिलिंद पवार यांना द्यावेत, असा आदेश न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दिला होता.

दरम्यान, २५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे वकील अ‍ॅड. संग्राम कोलाटकर यांनी ही सर्व कागदपत्रे आणि माझी जन्मठेप हे पुस्तक पुणे न्यायालयात अ‍ॅड मिलिंद पवार यांना हस्तांतरित केले. मात्र या कागदपत्रांची सत्यता व पडताळणी केल्याशिवाय खटला पुढे चालवता येणार नाही. कारण सर्व कागदपत्र व पुस्तक वाचल्यानंतर त्यामधील सत्यता स्पष्ट होईल आणि त्यानंतर नियमित सुनावणी नियमित घेता येईल. शिवाय या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास याला ठराविक कालावधी लागणार आहे. तोपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात यावी,असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात दाखल केला होता. ही मागणी मान्य करत, हा खटला येत्या ९ मेपर्यंत तहकूब ठेवण्याचा आदेश न्यायाधिश अमोल शिंदे यांनी दिला.