जम्मू-काश्मीरच्या शांततेवरील हल्ला खपवून घेऊ नका, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांची मागणी
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा मातंग एकता आंदोलनाच्यावतीने राज्यभर निषेध

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे दि. २६ एप्रिल २०२५ :- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा शनिवारी (दि. २६ एप्रिल) मातंग एकता आंदोलनाच्यावतीने राज्यभर निषेध करण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या शांतेतेवरील हल्ला हा खपवून घेऊ नये, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी यावेळी बोलताना केली आहे.
दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात २७ भारतीय नागरिकांची अमानुष हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश दु:खाच्या दरीत कोसळलेला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या भीषण घटनेच्या निषेधार्थ मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी संघटनेच्या वतीने या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुण्यातील भवानी पेठेतील कै. जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडा संकुल येथून कॅण्डल मार्च काढण्यात आला होता.
यामध्ये माजी गृहराज्यमंत्री संघटने रमेश बागवे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. हा दहशतवादी हल्ला मानवतेला काळीमा फासणारा असून देशातील नागरिकांनी याला न घाबरता शांतता,एकता व अखंडता कायम टिकविण्यासाठी ही लढाई कायमस्वरूपी यापुढेही चालू ठेवली जाईल. हे दहशतवादी हल्ले आपल्या देशातील अखंडता,एकता कधीही तोडू शकणार नाहीत, असे मत माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी यावेळी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्यावतीने सुरक्षेबाबत जास्तीत जास्त कठोर कारवाई करून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले त्वरित कसे थांबतील, यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र सरकारच्यावतीने दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचे अड्डे उध्वस्त करण्याकरिता कठोर भूमिका घ्यावी, सरकारच्या या भूमिकेस तआमचा पूर्ण पाठिंबा असेल. याबाबत आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत व निष्पाप भारतीयांचा बळी जाणार नाही. याची केंद्र सरकारने वेळीच नोंद घ्यावी, असे मत मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रमेश अंकलजी सोनावणे, यासेर बागवे, जावेद खान, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, राजश्री अडसूळ, सुरेखा खंडाळे, सुनिल बावकर,मधुकर चांदणे, दयानंद अडागळे, फय्याज शेख, हुसेन शेख , मारुती कसबे,सुनिल साळवे, संतोष शिंदे, अदित्य गायकवाड,दिपक गायकवाड, राहुल चिंदम आदींसह विविध पक्ष, समाज व संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.