नियतीपुढे कर्जबाजारी शेतकरी बाप हरला, पण पोरी जिंकल्या : दहावीच्या परीक्षेत मारली बाजी!

नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुली नियती व दुर्गाने केली नियतीवर 'मात'

नियतीपुढे कर्जबाजारी शेतकरी बाप हरला, पण पोरी जिंकल्या : दहावीच्या परीक्षेत मारली बाजी!
पुणे:- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दहावीच्या परीक्षेत बाजी मारलेल्या नियती इंगोले व दुर्गा क्षीरसागर.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि.१३ मे २०२५ :- निझामाच्या गुलामीतून मुक्त झाल्यापासून कायम मागास असलेला मराठवाडा,आजही तसाच मागास आहे. मुळात शेतकऱ्यांकडे कसण्यासाठी शेती क्षेत्र कमी, त्यातच शेतीचा पाण्याचा अभाव. यामुळे शेतीतून पीक घेण्यासाठी येणारा खर्चही शेतीच्या उत्पन्नातून मिळणं मुश्किल.यामुळं शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आणि यातून स्वतःची सुटका करण्यासाठी मृत्यूला कवटाळू लागले. या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करु लागेल.अशाच आत्महत्या केलेल्या कुटुंबातील दुर्गा व नियती या दोन मुलींनी दहावीच्या निकालात चक्क या क्रुर नियतीवर 'मात' केली आहे.कर्जबाजारीपणामुळे नियतीपुढे बाप हरला, पण पोरी जिंकल्या, जणू असाच संदेश या दोन मुलींनी दिला आहे. या दोन्ही मुलींनी दहावीच्या परीक्षेच्या निकालात बाजी मारली आहे. 

बापाने जन्म दिल्यानंतर वयाच्या सहाव्या, सातव्या वर्षापर्यंत बरं चाललं होतं. पण तोपर्यंत बाप मोठा कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे अगदी खेळण्या-बागडण्याच्या वयातच बापाने मृत्यूला कवटाळले आणि वयाच्या सहाव्या, सातव्या वर्षीच या मुली अनाथ झाल्या. बाप तर गेलाच. पण मायही सुशिक्षित नाही. आधीच कर्जबाजारीपणा. त्यातच हाताला काम नाही. अशा विभिन्न परिस्थितीत या दोन्ही मुलींचं शिक्षण सोडा पण जगणंही कठीण झालं होतं. पण पुण्यातील भोई प्रतिष्ठानने या मुलींना जगण्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने सुमारे नऊ -दहा वर्षांपूर्वी पुण्यात आणलं. त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलला आणि या मुलींनीही संधीचे सोने करत, दहावीत मोठे यश मिळविले आहे. 

ही कथा आहे, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरजवळ वाड्या-वस्त्यात राहणाऱ्या आणि वयाच्या सहाव्या वर्षीच पितृछत्र हरवलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या दोन निराधार व अनाथ मुलींची. यापैकी दुर्गाने दहावीच्या परीक्षेत ८६.४०  टक्के तर, नियतीने ७७ टक्के गुण मिळविले आहेत. 

पुण्यातीलभोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर या प्रकल्पांतर्गत गेल्या सात वर्षांपासून या मुली पुणे शहराजवळ असलेल्या पुरंदर तालुक्यातील वीर येथील अस्तित्व गुरुकुल या  निवासी शाळेत शिक्षण घेत आहेत.वडील हयात नाहीत.आई शेतात मोलमजुरी करते. अशा खडतर परिस्थितीत या दोन्ही मुलींनी दहावीमध्ये मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. 

भोई प्रतिष्ठानने मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सुमारे २५ विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात आणले आहेत. या सर्वांचा शिक्षणाचा खर्च भोई प्रतिष्ठान करत आहे. या दोन्ही मुलींनी या यशाबद्दल भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई आणि शेतमजुरी करुन पोट भरणाऱ्या आईंचे खास आभार मानले आहेत. 

'दुर्गा' ला व्हायचयं आय.पी. एस. 

दरम्यान, शिकून मोठे व्हायचे स्वप्न होते. पण वडिलांनी मध्येच साथ सोडली. त्यामुळे हे स्वप्न साकार कसे होणार, याचीच चिंता होती. पण ही चिंता आता भोई प्रतिष्ठानमुळे दूर झाल्याची प्रतिक्रिया या दोन्ही मुलींनी निकालावर बोलताना दिली आहे. यापैकी दुर्गा क्षीरसागरला भारतीय पोलिस सेवेत जायचे असून नियती इंगोला मात्र पोलिस व्हायचे आहे.