पुणेकरांनो, कोकणातील अस्सल गावरान हापूस, केशर,पायरी आंबा हवाय, तर चला मग पुणे 'झेडपी'च्या आंबा महोत्सवाला भेट देऊ यात...!
झेडपीतर्फे आजपासून (दि. १ एप्रिल) आंबा महोत्सव : उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना आंबा स्वस्त मिळणार

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ एप्रिल २०२५ :- महाराष्ट्रात सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. पण काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पुर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या आमराया (आमराई) आता नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात फक्त कोकणातच उत्तम दर्जाचा चांगला आणि गावरान आंबा उपलब्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना कोकणातील दर्जाचा आणि तोही बाजारातील किंमतीच्या तुलनेत स्वस्त मिळावा, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. या पुढाकारातून खास करुन पुणेकरांसाठी पुणे शहरातील गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये हा आंबा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रमांतर्गत हा महोत्सव दि. १ एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे. या आंबा महोत्सवात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमधील उत्तम दर्जाच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे.
दरम्यान, या आंबा महोत्सवातच पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांंनी उत्पादित केलेल्या अस्सल गावरान वस्तूंची खरेदी आणि विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. पुणे जिल्हा परिषद आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने मार्केट यार्ड येथे विक्री केंद्र असून यामध्ये एकूण 60 स्टॉल्स आहेत. यापैकी अनुक्रमे पहिले १५ स्टॉल्स हे उमेद अभियानांतर्गत बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तु व पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पुणे शहरातील चोखंदळ ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे. हा महोत्सव येत्या ३१ मे २०२५ पर्यंत चालू राहणार आहे.
या आंबा महोत्सवामध्ये उमेद अभियानांतर्गत बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तु व पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामुळे पुणेकरांना ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या चविष्ट पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. शेतकऱ्यांकडील धान्य उत्पादने थेट ग्राहकांना माफक दरात उपलब्ध होणार आहेत.
- चंद्रकांत वाघमारे,
- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,
- जिल्हा परिषद, पुणे.
आंबा विक्री व्यवस्थेतील मध्यस्थ वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या दर्जाचा आंबा उपलब्ध करून देणे, हा या उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रमांतर्गत आयोजित आंबा महोत्सवाचा उद्देश आहे. पणन महामंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु करणेत आला असून, यापुढेही दरवर्षी या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- अजित पिसाळ, जिल्हा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
'पणन मंडळा'तर्फे शहरात तीन ठिकाणी आंबा महोत्सव
दरम्यान, मार्केट यार्डमधील झेडपीच्या आंबा महोत्सवाशिवाय पणन मंडळाने शहरात अन्य तीन ठिकाणी आंबा महोत्सव सुरू केला आहे. हा आंबा महोत्सव कोथरूड येथील गांधी भवन, हडपसर येथील मगरपट्टा आणि खराडी या तीन ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.