World Blood donar day :- गेल्या २४ वर्षात तब्बल ८४ रुग्णांच्या मदतीला धाऊन जाणारा रक्तदाता : गिरीश सोळंकी!
जागतिक रक्तदाता दिन विशेष : सोळंकी यांचे गेल्या २४ वर्षात ८४ वेळा रक्तदान
डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १४ जून २०२५ :- रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान,अशी एक मराठीत म्हण आहे. कारण रक्त देणारा हा थेट अन्य एका व्यक्तीचा जीव वाचवत असतो. याचाच नवा आदर्श पुण्यातील ४६ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते गिरीश सोळंकी यांनी समाजाला घालून दिला आहे. सोळंकी यांनी गेल्या २४ वर्षात तब्बल ८४ वेळा रक्तदान करत, नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या रक्तदानामुळे आतापर्यंत ८४ रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
जगभरात दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो. यानुसार यावर्षीचा रक्तदाता दिवस शनिवारी (दि.१४ जून २०२५) साजरा केला जात आहे. या निमित्ताने रक्तदानाचा नवीन विक्रम करणारे सामाजिक कार्यकर्ते गिरीश सोळंकी यांची रक्तदानाची ही माहिती समाजासमोर यावी आणि त्यांचा आदर्श घेऊन रक्तदानासाठी अनेक तरुणांनी पुढे यावे, या उद्देशाने ही यशोगाथा प्रसिद्ध करत आहोत.
यावर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पनाच "रक्त द्या, आशा द्या अन् आपण सर्वजण एकत्रितपणे अनेकांचे जीव वाचवू यात." अशी आहे. मात्र यंदाची ही संकल्पना असली तरी गिरीश सोळंकी हे या संकल्पनेची मागील २४ वर्षांपासून तंतोतंत प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहे. सोळंकी यांनी आतापर्यंत ८४ वेळा रक्तदान केले आहे. यापैकी ६८ वेळा रक्तदान, कोरोना संसर्ग काळात ३ वेळा प्लाझ्मा आणि १३ वेळा प्लेटलेट्स दान केले आहे. शिवाय सोळंकी हे नेहमीच गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेत असतात. ते अनेकदा रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असतात. यासाठी त्यांना रक्ताचे नाते या संस्थेचे राम बांगड यांचे मार्गदर्शन लाभत असते.
पुण्यातील गरजू रुग्णांना रक्ताची मदत लागत असताना तत्परतेने रक्तदानासाठी पुढे येणारे गिरीश सोळंकी हे समाजकार्यातसुद्धा तेवढ्याच आपुलकीने पुढाकार घेत असतात. गुजरातमध्ये दि. २६ जानेवारी २००१ रोजी भूकंप झाला. तेथील भुकंपग्रस्तांसाठी वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच मागील २४ वर्षांपासून सोळंकी नियमितपणे रक्तदान करत आहेत. या रक्तदानासाठी ते ललित जैन आणि राम बांगड या दोन व्यक्तींना त्यांचे प्रेरणास्थान मानत आहेत. यासाठी त्यांना आई-वडील, भाऊ, पत्नी विनिता आणि मुलगा सिद्धार्थ यांचीही खंबीर साथ आहे.त्यामुळेच हे शक्य होत असल्याचे गिरीश सोळंकी यांनी सांगितले.
रक्तदान केल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. शिवाय याचा रक्तदात्याला स्वतःलासुद्धा विविध प्रकारचे आजार टाळण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक तरुणाने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान केले पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काही देणे लागत असतो. त्यामुळे गरजूंना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे, असे मी मानतो.
- गिरीश सोळंकी, रक्तदाते व सामाजिक कार्यकर्ते, पुणे.