चला, आज्जी-आज्जोबा, आई-बाबा, काका-काकू, मामा आणि मावशी आपण नात,नातू-पणतू, पुतण्या -पुतणी, भाच्चा-भाच्चीच्या बोटाला धरून साक्षर होऊ या, परीक्षा देऊ या....!
दहावी, बारावीच्या पाल्यांनंतर आता रविवारी होणार निरक्षरतेतून साक्षर झालेल्या पालकांची 'परीक्षा', अजूनही ऑनलाइन करा नोंदणी

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २२ मार्च २०२५ : केंद्र सरकारने पुर्वाश्रमीच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाऐवजी आता 'सर्वांसाठी शिक्षण' या अभियानांतर्गत सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पालकांसाठी मागील शैक्षणिक वर्षात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार या उपक्रमांतर्गतची निरक्षर पालकांची साक्षर झाल्यानंतरची पालकांची होणारी यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा येत्या रविवारी (दि. २३ मार्च ) आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेमुळे साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची व असाक्षरतेचा कलंक पुसण्याची संधी या निमित्ताने पालकांना उपलब्ध झाली आहे. किमान पंधरा वर्षे व त्यापुढील वयाच्या सर्व निरक्षर पालक ही परीक्षा देऊ शकणार असल्याचे
उल्लास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी (दि.२२ मार्च) सांगितले.
मागील शैक्षणिक वर्षात १७ मार्च २०२४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. केंद्र सरकारकडून वर्षातून दोन वेळा म्हणजेच सप्टेंबर व मार्च या दोन महिन्यात या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेले असाक्षर पालक व स्वयंसेवक यांच्यासाठी उल्लास ॲपवर वर्षभर ऑनलाईन नोंदणी सुरू असते. ज्या शाळेतून असाक्षरांची नोंदणी झाली आहे, त्याच शाळेत त्यांना परीक्षा केंद्र देण्यात येते. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असाक्षरांनी त्यांच्या सोयीने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
राज्य शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी यंदाची इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात आली. पाल्यांच्या या दोन्ही वर्गांच्या परीक्षा संपल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा ज्येष्ठांच्या परीक्षेसाठी कामाला लागली आहे.
मागील शैक्षणिक वर्षात १७ मार्च रोजी झालेल्या एफएलएनएटी परीक्षेस राज्यातून ४ लाख ५९ हजार इतके प्रौढ असाक्षर परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४ लक्ष २५ हजार उत्तीर्ण झाले. ही लेखी परीक्षा एकूण १५० गुणांची असून वाचन ५०, लेखन ५०, व संख्याज्ञान ५० अशी गुणविभागणी आहे. प्रत्येक भागात १६.५ व एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहेत.
चालू शैक्षणिक वर्षात ५ लक्ष ७७ हजार इतक्या असाक्षरांच्या नोंदणीचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १९ मार्च अखेर ५ लाख ६४ हजार ७५१ नोंदणी झाली आहे. त्यात १ लाख ६१ हजार ४६१ पुरुष तर ४ लाख ३ हजार ११७ स्त्रिया आणि ७३ तृतीयपंथीयांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षी नोंदणी झालेले परंतु परीक्षेस बसू न शकलेले, तसेच मागील वर्षात उत्तीर्ण होऊ न शकलेले आणि चालू वर्षात नव्याने नोंदणी झालेले असे एकूण सुमारे ८ लाख ४ हजार एवढे असाक्षर परीक्षेस प्रविष्ट करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. असाक्षरांना शिकवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून १ लाख ३३ हजार १४२ जणांची नोंदणी झाली आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी संयुक्तपणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळांवरही उल्लास कार्यक्रमाची जबाबदारी सोपवल्याने या कार्यक्रमास आणखी गती मिळत आहे. योजना शिक्षण संचालनालयाने या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय परीक्षा निरीक्षकांच्या निमित्त केल्या आहेत. शिवाय केंद्र शासन स्तरावरून महाराष्ट्रातील परीक्षेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक येणार आहेत.
कोल्हापूर विभागांतर्गत सातारा जिल्ह्यातून २३ हजार २५२, सांगली जिल्ह्यातून १७ हजार ७८०, कोल्हापूर जिल्ह्यातून २९ हजार ६८०, रत्नागिरी जिल्ह्यातून १० हजार ५७४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ६ हजार ५९६ अशा एकूण ८७ हजार ८८२असाक्षरांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, या परीक्षेच्या पुर्वतयारीचा आढावा कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय उपसंचालक महेश चोथे यांनी या विभागातील जिल्ह्यांसाठी ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. राज्य स्तरावरून सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना या परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
निरक्षर पालक व स्वयंसेवक नोंदणी आणि जोडणी उल्लास ॲपवर ऑनलाईन पद्धतीने शाळांमार्फत सुरू आहे. ज्यांची नोंदणी व जोडणी अद्याप होणे बाकी आहे, त्यांनी तातडीने करावी आणि या परीक्षेचा सराव करावा.
- राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ