सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनो, भूजल पुनर्भरण आणि संवर्धनासाठी हे करा
राज्याचे भूजल आयुक्त डॉ. विजय पाखमोडे यांचे राज्यातील सरपंच, ग्रामसेवकांना आवाहन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० मार्च २०२५ :- महाराष्ट्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जाऊ लागली आहे. यासाठी भूजलाचा अफाट उपसा हे एकमेव याचे कारण ठरू लागले आहे. भूजल पातळी खोल जाणे, ही चिंताजनक बाब आहे. शिवाय मानवासाठी नुकसानकारक ठरणारी घटना आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी भूजल पुनर्भरण आणि संवर्धनासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे भूजल आयुक्त डॉ. विजय पाखमोडे यांनी राज्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांना केले.
अटल भूजल योजना, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, यांच्या वतीने आयोजीत “अटल भूजल योजनेची फलनिष्पत्ती - Impact Assessment” या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घघाटन डॉ. पाखमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. पाखमोडे म्हणाले, "राज्यातील १३ जिल्ह्यांमधील १ हजार १३३ ग्रामपंचायतींमध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल पुर्नभरण, जलसंधारण आणि पाणी बचतीच्या विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत. परिणामी या ग्रामपंचायतींच्या हद्दीत भूजल पातळीत वाढ झाली आहे. पाण्याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेच्या माध्यमातून पाणी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेली गावे तयार झाली आहेत. ही कामे यापुढेही निरंतर चालू राहण्यासाठी गावाचे प्रमुख म्हणून सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि पाणी समितीने ग्रामस्थांच्या मदतीने काम करावे."
या कार्यशाळेसाठी अटल भूजल योजनेत समाविष्ट १३ जिल्ह्यांमधील वरिष्ठ भूवैज्ञानिक, नोडल अधिकारी (अटल) आणि सन २०२२-२३ या वर्षातील भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले होते.
यावेळी या योजनेचे सहसंचालक डॉ. प्रवीण कथने यांनी समाजासाठी आणि जीवनासाठी आवश्यक असणारे पाणी वाचविण्यासाठी ग्रामपंचायती करत असलेलले प्रयत्न आणि दिशादर्शक कामाबद्दल पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवकांचे कौतुक केले. पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या ग्रामपंचायतींनी पुरस्काराच्या रकमेतून कोणती कामे करावीत, याबाबत सहसंचालक व नोडल अधिकारी ऋषिराज गोसकी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेतीमध्ये एआय, ड्रोन, ॲटोमॅटीक वेदर स्टेशन यासारख्या तंत्रज्ञानांची गरज, फायदे, जल अंदाजपत्र तयार करण्याची गरज, प्रभाव मुल्यांकन संकल्पना आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी अटल भूजल योजनेतून तयार झालेल्या उपाययोजनांमुळे उपलब्ध झालेला भूजल साठा आणि झालेल्या फायद्यांबाबत सरपंचांनी मनोगत व्यक्त केले.