पुणे विभागातील ६५ गावे आणि ४२१ वाड्या-वस्त्यांच्या घशाला कोरड!

पाणीटंचाईचे तीव्र चटके जाणवू लागले ः ६७ टॅंकरद्वारे भागवली जातेय नागरिकांची तहान

पुणे विभागातील ६५ गावे आणि ४२१ वाड्या-वस्त्यांच्या घशाला कोरड!
पुणे :- पुणे विभागातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणारे टॅंकर.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ११ एप्रिल २०२५ :-  यंदाच्या उन्हाळ्यातील मार्च महिना संपताच पुणे विभागातील गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सध्या पुणे विभागातील ६५ गावे आणि ४२१ वाड्या-वस्त्यांच्या घशाला कोरड पडली आहे. उन्हाळ्यातील पहिल्या महिन्यापासूनच ही गावे आणि वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. या सर्व गावांमधील मिळून सुमारे एक लाखांहून अधिक लोकसंख्या आणि २० हजार जनावरांची तहान भागविण्यासाठी ६७ टॅंकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

पुणे विभागात सर्वाधिक ४१ टॅंकर्स हे सातारा जिल्ह्यात सुरु असून, कोल्हापूर जिल्हा मात्र अद्यापही टँकरमुक्त आहे.सध्या सुरु असलेल्या एकूण टॅंकर्समध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक ४१ टॅंकरबरोबरच सांगली जिल्ह्यातील ०२, पुणे २० आणि सोलापूर ०४   टॅंकर्सचा समावेश आहे. 

कोल्हापूर जिल्हा अद्याप टँकरमुक्त

दरम्यान, पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून आजअखेरपर्यंत एकही टँकर सुरु करावा लागलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा गेल्या वर्षभरापासून कायम टँकरमुक्त आहे. या जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातही आजअखेरपर्यंत (दि.११ एप्रिल) एकही टँकर सुरु झालेले नाही. त्यामुळे पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा हा अद्याप टँकरमुक्त आहे.

पुणे जिल्ह्यातील २२ गावे तहानलेली

पुणे जिल्ह्यातील २२ गावे १२१ वाड्या-वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही गावे आणि वाड्या-वस्त्यांना सध्या एकूण २० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. 

विभागातील पाणीटंचाई दृष्टीक्षेपात...

-जिल्हा --- टंचाईग्रस्त गावे --- वाड्या-वस्त्या --- सुरू असलेले टँकर्स
- सातारा --- ३८ गावे --- २४२ वाड्या --- ४२ टँकर्स
- पुणे --- २२ गावे --- १२१ वाड्या --- २० टँकर्स
- सांगली --- ०१ गाव --- ९ वाड्या --- २ टँकर्स
- सोलापूर --- ४ गावे --- ३९ वाड्या --- ०४ टॅंकर्स
- कोल्हापूर --- शून्य --- शून्य --- शून्य