महसूलविषयक कामांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार, विभागनिहाय अभ्यासगट स्थापन करणार !
महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतीची येत्या स्वातंत्र्यदिनापासून अंमलबजावणी : महसूल अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ एप्रिल २०२५ :- महाराष्ट्रातील महसूल विभागातील सध्याची कार्यपद्धती आता कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या विभागाची नवीन कार्यपद्धती कशी असावी, याचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील सर्व महसूल विभागांमध्ये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन केला जाणार आहे. या अभ्यासगटांनी केलेल्या शिफारशींनुसार नवीन कार्यपद्धती अंमलात आणली जाणार आहे. सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी येत्या स्वातंत्र्यदिनापासून (दि. १५ ऑगस्ट २०२५) केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
महसूल विभागातील विविध बाबी, रचना, कार्यपद्धती,महसूली कायदे आदींमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणत्या बाबी करणे अनिवार्य आहे, याचा अभ्यास विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विविध अभ्यासगट करणार आहेत. या सर्व अभ्यासगटांच्या शिफारशींवर चर्चा करुन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे येथे दोन दिवशीय महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूरचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकणचे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, राज्याचे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणीस म्हणाले, "महसूल विभाग हा सरकारचा चेहरा आहे. हा विभाग नागरिकांशी सर्वाधिक जोडला गेलेला आहे. त्यामुळे या विभागाच्या कार्यक्षमतेवर, पारदर्शकतेवर आणि उत्तरदायित्वावर सरकारचे मूल्यमापन केले जात असते.अतिशय प्राचीन अशा राज्य पद्धतीमध्येसुद्धा महसूल विभाग अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. पावणेदोन हजार वर्षापूर्वीच्या चाणक्यांच्या अर्थशास्त्रात या विभागाची रचना आणि महत्त्व पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांनी देखील महसूलची चांगल्या प्रकारची रचना केली होती. आज्ञापत्राच्या माध्यमातून महसूल जमा करणे, त्याचे व्यवस्थापन, जमिनीचे अभिलेख जतन करणे, या संदर्भात अतिशय सुंदर अशा आज्ञावली त्यांनी तयार केल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांनी एक मोठी जमीन महसूलाची पद्धत उभी केली. ज्यातून आपली महसूल पद्धती निर्माण झालेली आहे. अर्थात आपली पारंपरिक पद्धतीतील अनेक बाबींचा समावेशही यात दिसून येतो."
'नागरिकांना माहितीसाठी अर्जची गरज नको,अशी व्यवस्था निर्माण करा'
महसूल विभागाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. मात्र हे संकेतस्थळ आता नागरिकस्नेही तसेच त्याच्यावर स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटीकरण असले पाहिजे. माहितीच्या अधिकारात नागरिेकांना माहिती मागण्याची गरजच पडू नये, यासाठी पुढील चार ते सहा महिन्यात जेवढी माहिती मागितली जाते, ती सर्व माहिती या संकेतस्थळावर असेल, असा प्रयत्न स्वयंस्फूर्तीने करावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.
या कार्यक्रमात महसूल विभागाच्या महसूल अधिकारी नियमपुस्तिकेचे आणि राज्यातील विविध विभागाच्या विविध उपक्रमांचे, संगणक प्रणालींचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेस राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आभार मानले.