राजपत्रित अधिकारी संघटन चळवळीतील नेते ग.दि. कुलथे अनंतात विलीन

कुलथे यांच्या पार्थिवावर नवी मुंबईत अंत्यसंस्कार : कुटुंबीय व राजपत्रित अधिकाऱ्यांनी मंगळवारी  साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप 

राजपत्रित अधिकारी संघटन चळवळीतील नेते ग.दि. कुलथे अनंतात विलीन
नवी मुंबई:- राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते दिवंगत ग. दि. कुलथे.

ग्रामराज्य वृत्तसेवा, पुणे 

नवी मुंबई, दि. १५ एप्रिल २०२५ :-   राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक व सल्लागार गणपत दिनकर ऊर्फ ग. दि. कुलथे हे मंगळवारी (दि.१५ एप्रिल) दुपारी अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी नवी मुंबईतील नेरुळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबिय आणि राज्यातील आजी-माजी राजपत्रित अधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी ग.दि.कुलथे यांना अखेरचा निरोप दिला. 

राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक असलेले ग. दि. कुलथे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी सोमवारी (दि.१५ एप्रिल) रात्री नऊ वाजता निधन झाले होते. आज त्यांच्या कुटुंबियांच्या आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेरूळ येथील शांतीधाम येथे कुलथे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुलथे कुटुंबियांसमवेत विविध शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष रवींद्र धोंगडे, विद्यमान अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, दुर्गा मंचच्या अध्यक्षा डॉ.सोनाली कदम, माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ आदींनी दिवंगत कुलथे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी उपस्थित सर्वांनी दिवंगत ग.दि.कुलथे यांचे संघटना चळवळीतील राहिलेले अपूर्ण कार्य त्याच तडफेने, प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा संकल्प केला.

दरम्यान, कुलथे यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुलथे यांचा जन्म १ मार्च१९३९ रोजी तत्कालीन अहमदनगर ( सध्या अहिल्यानगर) जिल्ह्यातील पारनेर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांनी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका योजनेतून रयत शिक्षण घेतले होते. त्यांनी सुरूवातीला विक्रीकर विभागात  लिपिक म्हणून सेवा सुरु केली आणि कर्मचारी संघटनेत ते स्थिरावले. कर्मचारी संघटनेत विविध पदावर काम करीत बृहन्मुंबई कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस पदी प्रभावीपणे कार्य केले.अधिकारी पदावर पदोन्नत झाल्यानंतर विक्रीकर अधिकारी संघटनेतसुद्धा त्यांनी  महत्त्वाची विविध पदे भूषविली.विक्रीकर विभागात कार्यरत असतानाच दि. ७ फेब्रुवारी १९८६ रोजी त्यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाची स्थापना केली. या महासंघात प्रथम ७ विभागीय संघटना होत्या. त्याचा विस्तार होऊन आता त्या ७२ झाल्या आहेत.