सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांचा कै.बाळासाहेब भारदे समाजभूषण पुरस्काराने गौरव 

काव्यात्मा साहित्य परीषदेतर्फे राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान

सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांचा कै.बाळासाहेब भारदे समाजभूषण पुरस्काराने गौरव 
पिंपळे गुरव:- सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांना कै.बाळासाहेब भारदे समाजभूषण पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ मार्च २०२५ :-  पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांना कै. बाळासाहेब भारदे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित  करण्यात आले. यावेळी बोलताना म.भा.चव्हाण म्हणाले, "ज्यांना कुणीच नाहीत. मुले-बाळेही नाहीत. त्यांनी त्यांच्या वंशासाठी झाडे लावावीत, म्हणजे आयुष्यात निराशा पदरी पडणार नाही.वृक्ष स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. यातून माणसांनी बोध घेणे गरजेचे आहे." झाडे नेहमीच परोपकाराची भुमिका घेतात.‌स्वतः उन्हात राहून इतरांना सावली देतात. तसे चांगल्या विचारांची माणसंच जिवनात प्रकाश निर्माण करतात. यातून समाजाला दिशा मिळते, असे मत पुरुषोत्तम सदाफुले यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.

वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले, "आयुष्याची किंमत करायची असेल तर, वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. तेव्हाच आयुष्याचा प्रवास अधिक प्रमाणात सुखकर होईल आणि माणसाला  सुखाचा अनुभव कायम घेता येईल.आण्णा जोगदंड  म्हणाले,"  गांधीवादी विचारांचे शिक्षणतज्ज्ञ, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष कै.बाळासाहेब भारदे समाजभुषण पुरस्कारामुळे माझ्यावर आता दिल्यामुळे मी गांधीवादी विचारांची जबाबदारी अधिक क्षमतेने पार पाडील."

विविध पुरस्काराचे मानकरी ठरलेले विविध क्षेत्रातील नामवंत पुढीलप्रमाणे आहेत. अण्णा जोगदंड (कै. बाळासाहेब भारदे समाजभूषण पुरस्कार), कवयित्री शोभा जोशी (काव्यसाधना जीवन गौरव पुरस्कार), सुहास घुमरे (गझलकार प्रकाशदादा बनसोडे पुरस्कार), कवी किसन म्हसे ( काव्य प्रतिभा पुरस्कार), कवी जितेन सोनवणे (शब्दप्रभू काव्य पुरस्कार), अरविंद सगर ( गझल काव्य विशेष सन्मान पुरस्कार), विजय जाधव (काव्यात्मा जनजागृती सेवा पुरस्कार), कामुदास चव्हाण (कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षक पुरस्कार), ज्ञानेश्वर किर्दंत (महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार),जाकीर लतिफ मुलानी (काव्यात्मा श्नमप्रतिष्ठा पुरस्कार) राहूल जाधव(काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार) आणि शरद काणेकर ( काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार). 

पुरस्कार वितरण समारंभानंतर प्रसिद्ध कवी अनिल दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली काव्य जागर संमेलन पार पडले. माणसा-माणसाला जोडून ठेवण्याचे सामर्थ्य कवितेत असते. कविता ही समाजकल्याणाच्या हिताचा कायम विचार करत असते, असे मत  अनिल दिक्षित यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. या कवी संमेलनात राज्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे ३५ कवी-कवयित्रींनी कविता सादर केल्या.

यावेळी ज्येष्ठ  गझलकार म.भा.चव्हाण, पुरुषोत्तम सदाफुले, श्नीकांत चौगुले, महेंद्र भारती, वृक्षमित्र अरुण पवार, सविता इंगळे, सुरेश वाकचौरे, महेमूदा शेख होते. या कार्यक्रमाच्या संयोजनात सुरेखा हारे , संगिता जोगदंड, दत्तू  ठोकळे, संजय साळुंखे, महेश क्षिरसागर आणि मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम हारे यांनी केले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संजय साळुंखे यांनी आभार मानले.