आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार गावाने यंदाही परंपरा कायम राखली, पण कशाची, ते पहा!
यंदा या परंपरेचे सलग सोळावे वर्ष : हाच आदर्श राज्यातील सर्व गावांनी घेण्याची गरज

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३१ मार्च २०२५ :- राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष आणि आदर्श गाव हिवरे बाजार (जि. अहिल्यानगर) येथील माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या गावाने पीककर्ज परतफेडीची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या गावातील शेतकरी मागील सलग १५ वर्षांपासून पीककर्जाची मुदतीत १०० टक्के परतफेड करत आहेत. यंदाचे वर्ष या परंपरेचे १६ वे वर्ष ठरले आहे. हिवरे बाजार हे अशा पद्धतीचे राज्यातील एकमेव गाव ठरले आहे. या परंपरेच्या माध्यमातून हिवरे बाजार गावाच्या शिरपेचात आणखी एका आदर्शाची भर पडली आहे.
राज्यातील अनेक गावांमधील शेतकरी हे सरकार आज या उद्या पीककर्ज माफ करेल, या आशेने बसले आहेत. याउलट आपण घेतलेल्या पीककर्जाची परतफेड करणे हे आपले कर्तव्य त्यांच्याकडील कर्जाची मुदतीत परतफेड करत आहेत. यासाठीच त्यांचा हा अन्य गावांनी घेण्याची गरज आहे. याशिवाय एकदा घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय पुन्हा पीककर्ज मिळू शकणार नाही, याची जाणीव प्रत्येक शेतकऱ्याने ठेवणे गरजेचे आहे.
हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची मार्चअखेर शंभर टक्के वसुली करण्याच्या या परंपरेने यंदा सोळाव्या वर्षीत पदार्पण केले आहे. गावातील सर्व सभासदांनी सोमवारी (दि.३१ मार्च) एकूण ३ कोटी ६ लाख रुपयांच्या पिककर्जाचा भरणा केला आहे. कर्जाची परतफेड केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्यात आले आहे.
आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १०० टक्के वसुलीचे प्रयत्न यशस्वी ठरले. प्रत्येक सभासदाने कर्जाची रक्कम भरून खाते नियमित करून घेतले. यासाठी सोसायटी सभासदांच्या सहकार्याबरोबरच सोसायटीचे चेअरमन छ्बुराव ठाणगे, व्हाईस चेअरमन रामभाऊ चत्तर, सरपंच विमल ठाणगे, एस.टी. पादिर, रो.ना.पादिर,अर्जुन पवार, दामोधर ठाणगे, अशोक गोहड ,सहदेव पवार, बाबा गुंजाळ, राजू सहादू ठाणगे, संदीप गुंजाळ आणि सोसायटीचे सचिव कुशाभाऊ ठाणगे आदींनी प्रयत्न केले.