State board reopening from Monday :- राज्यातील सरकारी शाळांची सोमवारपासून घंटा वाजणार, शाळेच्या पहिल्या दिवशी झेडपी शाळा प्रवेशोत्सव साजरा करणार!
नव्या विद्यार्थ्यांचे टाळ, मृदंग,ढोल, ताशांच्या गजरात आणि सनई-चौघड्यांच्या सुरात स्वागत करणार : मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचेही वाटप होणार

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १५ जून २०२५ :- महाराष्ट्रातील सरकारी शाळांची म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी (एस.एस.सी. बोर्ड) संलग्न असलेल्या शाळांची येत्या सोमवारपासून (दि. १६ जून) घंटा वाजणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवेशोत्सवात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे टाळ, मृदंग, ढोल, ताशांच्या गजरात आणि सनई-चौघड्यांच्या सुरात स्वागत केले जाणार आहे. शिवाय झेडपी शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत एक गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षाची (सन २०२५ -२६) सुरवात विदर्भाचा अपवाद वगळता राज्यातील अन्य सर्व विभागात येत्या सोमवारपासून (दि.१६ जून) होत आहे. विदर्भातील शाळा मात्र एक आठवडा उशीरा म्हणजेच दि. २३ जूनपासून सुरू होणार आहेत.या नवीन शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी राज्य सरकारने १०० टक्के शाळांना भेटी देणे, हा उपक्रम राबविण्याचा आदेश दिलेला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या व दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींसह सनदी अधिकारी हे अनुक्रमे आपापल्या मतदारसंघात आणि कार्यक्षेत्रात किंवा जवळच्या किमान एका शाळेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत संपर्क अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या सर्व भेटीचे नियोजन महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी करणार आहेत.दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी एक दत्तक शाळा देण्यात येणार आहे. या शाळांना वर्षभर वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता व शाळांच्या भौतिक सुविधांचा आढावा घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे.
राज्यातील शिक्षण विभागातील अधिकारी ( उदा. प्राचार्य डाएट, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना, जेष्ठ अधिव्याख्याते, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता,अधीक्षक,शिक्षण विस्तार अधिकारी आदींना प्रत्येकी किमान तीन शाळा दत्तक घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने शाळांना दिलेल्या सूचना
- शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय परिसर स्वच्छ ठेवावा.
- शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढावी.
- नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे.
- मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप लोकप्रतिनिधींच्या हस्ते करावे.
- शैक्षणिक गुणवत्ता उपक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात यावा.
- शाळांमधील भौतिक सुविधांचा आढावा घेण्यात यावा.
- शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करावा.
राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष येत्या सोळा जूनपासून सुरु होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात येणार आहे. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, माजी विद्यार्थी,लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत रांगोळी काढून, पुष्पगुच्छ, वृक्ष भेट देऊन व शुभेच्छा फलक लिहून करण्यात येणार आहे.
- दत्तात्रेय जानकू वाळुंज,
माजी सदस्य,शिक्षण समिती, जिल्हा परिषद पुणे.