संचालक साहेब, वाढत्या उन्हामुळे शालेय मुलांच्या आरोग्याचा धोका वाढलाय, त्यामुळे संकलित वेळापत्रकाचा पुनर्विचार करा
पुणे झेडपीच्या 'गुरुजीं'चे शिक्षण आयुक्तांना साकडे : शालेय वार्षिक परीक्षांचे नियोजित वेळापत्रक बदला

गजेंद्र बडे: ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ मार्च २०२५ :- संचालक साहेब, पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यामुळे या उन्हाने आताच शालेय मुलांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे. शिवाय राज्यातील विविध भागातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा आयोजित करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे याबाबत आपण जाहीर केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत पुनर्विचार करावा आणि त्यात बदल करावा, अशी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रेय वाळुंज यांनी केली आहे. श्री. वाळूंज यांनी या मागणीसाठी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांना पत्र पाठविले आहे.
राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व वर्गांच्या वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन आणि प्रगतीशील मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) एकाच वेळी आयोजन करणेबाबतचे संकलित वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सर्व शाळांना पाठविले आहे. राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग विद्यार्थ्यांना अध्ययनाकरिता व्हावा, हा या संकलित वेळापत्रकाचा उद्देश असल्याचे राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या संकलित वेळापत्रकानुसार दि. ८ ते २५ एप्रिल २०२५ याच कालावधीत या सर्व वर्गांच्या परीक्षा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्यक्षात इयत्ता पहिली ते चौथीच्या परीक्षा या २२ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. शिवाय पाचवी ते नववीच्या परीक्षा या दि ८ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत घेण्याचे वेळापत्रक दिलेले असल्याचे वाळूंज यांनी या पत्रात नमूद केले आहे.
सध्या, राज्यातील प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती व उन्हाची तीव्रता वेगवेगळी आहे. या बाबींचा विचार करता, वार्षिक परीक्षांचे संपूर्ण नियोजन त्या त्या शालेय व्यवस्थापनावर सोडण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा श्री. वाळूंज यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. काही शाळांची पटसंख्या मोठी आहे. दि. २५ एप्रिलनंतर उत्तरपत्रिका तपासणे, गुणतक्ते तयार करणे, संकलित व वार्षिक परीक्षा नोंदवही निकाल नोंदविणे, विद्यार्थीनिहाय स्वतंत्र गुणपत्रक तयार करणे यासाठी अतिशय कमी कालावधी मिळत आहे. या सर्व बाबी आणि उन्हाची तीव्रता याचा विचार करून शालेय व्यवस्थापनाला नियोजन करण्याचे अधिकार द्यावेत अशी शिक्षकांची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुळात चाचणी व परीक्षा आयोजित करणे, हे शाळा स्तरावरचे नियोजन असते. यानुसार राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी दिलेल्या या वेळापत्रकाबाबत उन्हाच्या तीव्रतेमुळे सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. एप्रिल महिन्यात उत्तरोत्तर वाढत जाणारी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत पुनर्विचार करण्यात यावा, अशी शिक्षकांची मागणी आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
- दत्तात्रेय वाळुंज,
माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ.